Uncategorized

कुरार पोलिसांचे दलितविरोधी कारनामे! डॉ बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करणाऱ्यांना अभय, तक्रारदाराला जेल

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा :

मुंबई: (प्रतिनिधी ) मुंबईतील कुरार पोलीस ठाण्याच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विटंबनेच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या, तर तक्रार करणाऱ्या दलित व्यक्तीवरच खोटा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा  अपमान करणाऱ्या आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना बचावासाठी संधी दिली गेली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत, त्याच आरोपींनी तक्रारदार दलित व्यक्तीविरोधात खोटा गुन्हा नोंदवला, आणि पोलिसांनी तातडीने तो स्वीकारून कारवाई केली. म्हणजेच, बाबासाहेबांच्या विटंबनेच्या प्रकरणात मुख्य तक्रारदारालाच आरोपी बनवण्यात आले!

तथापि, ॲड नितीन सातपुते ॲड दीपक जगदेव आणि सामाजिक संघटनेच्या दलित कार्यकर्त्यांच्या सातत्याने आवाज उठवल्यानंतर तब्बल 14 दिवसांच्या संघर्षानंतर अखेर विटंबना करणाऱ्या आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला. मात्र, तो केवळ दिखावा ठरला, कारण पोलिसांनी अद्याप कोणत्याही आरोपीला अटक केली नाही.

त्याचा फायदा घेत मुख्य आरोपीने पुन्हा एका दलित महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली, तिच्याकडून पैसे काढून घेतले. तरीही पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने न घेता फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर मोठे संशय निर्माण झाले आहे.

यावर आणखी संतापजनक बाब म्हणजे, महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या आरोपीने परत मारहाण करून खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा याची माहिती कंट्रोल रूम आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी वपोनि जनार्दन परबकर यांना देण्यात आली, तेव्हा त्यांनी आरोपी जामीनावर मुक्त असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात जामीन झाला नव्हता, पण तरीही पोलिसांनी दिशाभूल करून आरोपीला फरार होण्यास मदत केली.

सर्वात धक्कादायक म्हणजे, विटंबनेच्या मुख्य प्रकरणातच दलित तक्रारदाराला अटक करून जेलमध्ये डांबण्यात आले, तर खरे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. 30 दिवस उलटूनही आरोपींवर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही, उलट त्यांना पाठीशी घालण्याचे स्पष्ट प्रयत्न सुरू आहेत.

या संपूर्ण प्रकारात कुरार पोलीस ठाणे एका विशेष दबावाखाली काम करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ॲड नितिन सातपुते ॲड दीपक जगदेव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जाणूनबुजून आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हा प्रकार दलित समाजासाठी गंभीर आहे, आणि अशा घटनांमध्ये त्वरित न्याय मिळण्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजे अशी प्रतिक्रिया मुंबई उच्च न्यायालयाचे कायदे तज्ञ वकील ॲड नितीन सातपुते यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button