गुजरातच्या ‘EVM’मुळे विधानसभा निवडणुकीत 50 हजार मतांचा घोळ? ; प्रशांत जगतापांचं मोठं विधान !

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. यानंतर या विजयाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशाच प्रकारचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसर मधील उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला आहे.
फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हडपसर मध्ये मतदानामध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप करत त्याबाबतची इनसाईड स्टोरी सांगितली आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा पराभव झाला. मात्र एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीला हडपसरच्या मतदारांनी एक लाख 27 हजार 688 मत मिळाली. फक्त 7122 मतांनी माझा पराभव झाला. त्यामुळे ज्यांनी मला मतदान केलं त्यांचे आभार आणि ज्यांनी मला मतदान केले नाही त्यांचे पण आभार कारण लवकरच त्यांना आपण प्रशांत जगताप यांना मतदान केलं नाही याचा पश्चाताप वाटेल. असं जगताप म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्यभरामध्ये 86 जागा लढल्या तर पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही 13 ते 14 जागा लढलो. मी हरलो असलो तरी या 86 उमेदवारांमध्ये सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाची मतं मला मिळाली आहेत. माझ्यापेक्षा जास्त मतदान मिळालेले फक्त दोनच नेते असून त्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना माझ्यापेक्षा जास्त मतदान मिळाला आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात 532 बुथ होते. त्यातील प्रत्येक बुथवर 12 ते 25 बोगस मतदान झाले आहे. मतदारसंघात तब्बल 9000 हून अधिक बोगस मतदान झाला आहे.त्या मतदान मुळेच माझा पराभव झाला आहे. ती माहिती मी माहितीच्या अधिकारात मागवली असून ती सर्वांपुढे मांडणार आहे.तसेच मतदान केंद्रामध्ये आम्हाला सहा ते सात ईव्हीएम मशीनचे सील तुटलेलं भेटले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी 7000 हजार मतांची फेरफार झाल्याची देखील संशय आम्हाला आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ज्या ईव्हीएम मशीन वापरण्यात आल्या. त्या गुजरातमधून आणण्यात आल्या होत्या. त्या मशीनमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी 15 टक्के मतदान हे इनबिल्ड होतं असं राजकीय जाणकार सांगत आहेत. यामुळे माझ्या मतदारसंघात 40 ते 50 हजार मतांचा घोळ झाला असण्याची शक्यता असल्याचा दावा प्रशांत जगताप यांनी केला आहे.
मुख्य संपादक:विजयसिंह गायकवाड
मो.नं.9834099800