हडपसर मतदारसंघात आघाडीत बिघाडी; माजी मंत्र्यांसह माजी आमदाराने थोपटले दंड

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर जागावाटपाचा पेच सोडवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता सोमवार व मंगळवार शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यातच आता हडपसर मतदारसंघात मात्र उमेदवार निश्चित होताच आघाडीतील मित्र पक्षाचे माजी मंत्री व माजी आमदाराने निर्धार मेळाव्यात दंड थोपटून आव्हान दिले आहे.
राज्यात वरिष्ठ पातळीवर महायुती व महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटत आला असतानाच हडपसर मतदारसंघात मात्र उमेदवार निश्चित होताच आघाडीतील मित्र पक्षाचे माजी मंत्री व माजी आमदाराने निर्धार मेळाव्यात दंड थोपटून आव्हान दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात सध्या आघाडीत बिघाडीच्या राजकारणावर जोरदार चर्चा रंगली आहे.
काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हडपसर विधानसभा काँग्रेस समितीच्या वतीने नुकत्याच घेतलेल्या निर्धार मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागांच्या अदलाबदलीत काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे घेऊन बाळासाहेब शिवरकर (Balashaeb Shivarkar) यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी जोरदार मागणी केली, असे न झाल्यास पुरंदरमध्ये आघाडी तर हडपसरमध्ये बिघाडी करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. मतदारसंघाचे अध्यक्ष दिलीप शंकर तुपे यांनी मेळाव्याचे नियोजन केले होते.
जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार महादेव बाबर यांनी कार्यकर्ते व शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपल्या संपर्क कार्यालयावर मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आघाडीच्या जागा वाटपावर तीव्र नाराजी व्यक्त करीत माजी आमदार बाबर यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची मागणी केली.
बाबर म्हणाले “मला आघाडीच्या निर्णयापेक्षा शिवसैनिक व कार्यकर्त्यांचा आदेश महत्त्वाचा वाटतो. त्यांच्या आग्रहामुळेच मी हडपसर विधानसभा अपक्ष म्हणून लढवणार. प्रामाणिकपणे काम करूनही साथ मिळत नसेल तर, मला कार्यकर्त्यांचा अपमान करायचा नाही. आता बस्स झाले.’
या दोन्ही माजी आमदारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आघाडीत सध्या बिघाडीची परिस्थिती दिसत आहे. त्यांचे हे बंड थंड करण्यासाठी आघाडीतील नेत्यांना कितपत यश येईल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.