संत तुकाराम महाराज पालखी पाटसला विसाव्यासाठी आगमन; नागेश्वर मंदिर परिसर हरिनामाने दुमदुमला!
पाटस ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात पालखीचे पारंपरिक स्वागत

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
संत तुकाराम महाराज पालखी पाटसला विसाव्यासाठी आगमन; नागेश्वर मंदिर परिसर हरिनामाने दुमदुमला!
प्रतिनिधी – पाटस | संजय पवार,
पाटस (ता. दौंड) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (दि. २५) सकाळी पाटस गावात पोहोचताच नागेश्वर मंदिरात भाविकांनी जल्लोषात स्वागत केले. पुणे जिल्ह्यातील वरवंडहून निघालेली ही पालखी उंडवडी (ता. बारामती) मुक्कामी रवाना होण्याआधी पाटस येथे दुपारच्या विसाव्यास थांबली होती.
वरवंड ते उंडवडी हा २३ किमी लांबीचा अवघड वळणदार रोटी घाट पार करण्यासाठी पालखी सोहळा सकाळी ७.३० वाजता पाटस हद्दीत दाखल झाला. पाटसच्या हद्दीतील भागवतवाडी येथे पावणे आठ वाजता झालेल्या आगमनावेळी पालखी सोहळ्याचे चहा-नाष्ट्याने स्वागत करण्यात आले. त्यानंतर ९ वाजता पालखी पाटसच्या ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात दाखल झाली. मंदिरात पालखीने प्रवेश करताच दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली.
पालखीच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने गोड जेवणाची तयारी केली होती. हरिनामाच्या गजरात मंदिर परिसर मंत्रमुग्ध झाला होता. यावेळी पाटस गावच्या सरपंच तृप्ती भंडलकर, उपसरपंच छाया भागवत, ग्रामसेवक सयाजी क्षीरसागर, कुसेगावचे ग्रामसेवक भाऊसाहेब कांबळे, जयंत शितोळे पाटील, संभाजी देशमुख, योगेंद्र शितोळे देशमुख, सत्वशील शितोळे, स्वप्नील भागवत, गणेश चव्हाण, शंकर पवार, अशोकराव पानसरे, विकास कोळपे, माणिक चोरमले, सागर शितोळे, शिवाजीबापू ढमाले, अमोल भागवत आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता पालखी रोटी घाट पार करण्यासाठी निघणार होती. यंदा पावसाने लवकर आगमन केल्याने घाट परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला दिसतो आहे. घाट पार करताना बैलजोड्यांची मदत घेतली जाणार असून, हे दृश्य पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविक रोटी घाटात मोठ्या संख्येने जमले होते.
रोटी घाट पार केल्यानंतर पालखी हिंगणीगाडा मार्गे वासुंदे गावातून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास मुक्कामी पोहोचणार आहे.
वारकऱ्यांनी पाटस गावातील सेवाभावी वातावरणाचे व स्वागताचे भरभरून कौतुक करत “पाटसकरांचे प्रेम आणि आदर न विसरण्याजोगा आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.