Uncategorized

पाटसमध्ये श्री सिमेंटच्या प्रदूषणाचा उगम; ग्रामसभेत ठराव मंजूर – एक महिन्यात थांबवा अन्यथा कंपनी बंद करण्याची मागणी!”

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पाटस (प्रतिनिधी)  दौंड तालुक्यातील पाटस गावातील श्री सिमेंट कंपनीकडून गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वायू व जलप्रदूषण केलं जात आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील शेती नापिक होत चालली असून, पिकांवर सिमेंटधूळ साचल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. फवारलेला चारा जनावरे खाणं टाळत आहेत, पाणी दूषित झाल्याने जनावरांच्या आरोग्यावरही घाला येत आहे.

या गंभीर स्थितीमुळे शेतकरी आणि जय शिवसंग्राम संघटनेने कंपनी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या. मात्र, ना कंपनीकडून ना मंडळाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलटपक्षी, प्रदूषण वाढतच असून, काही हितसंबंधांमुळे मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ताज्या घडामोडीनुसार, परिसरातील शेतकऱ्यांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या गेटसमोर तीन दिवस आमरण अन्नत्याग उपोषण केलं, तरीही प्रशासन आणि कंपनीने याची दखल घेतलेली नाही. याउलट, ग्रामपंचायतीकडून ‘प्रदूषण होत नाही’ अशा प्रकारचं पत्र घेऊन कंपनीने स्वतःच्या बचावासाठी वापर केल्याची माहिती ग्रामस्थांमध्ये संतापाचं कारण ठरली आहे.

या पार्श्वभूमीवर, काल दिनांक 30 रोजी झालेल्या पाटस ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आला. श्री सिमेंट कंपनीने एक महिन्याच्या आत हवेचं व पाण्याचं प्रदूषण पूर्णपणे थांबवावं, अन्यथा ग्रामपंचायतमार्फत कंपनी बंद करण्याची कारवाई करण्यात यावी, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

ग्रामपंचायतीनेही या ठरावाच्या अनुषंगाने तातडीने श्री सिमेंट कंपनी व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना लेखी पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण जनतेचा आवाज – आता कंपनीलाथांबवण्याचा इशारा!

संपादक ;विजयसिंह गायकवाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button