मातकुळीत दलित शेतकऱ्याच्या जमिनीवर बेकायदेशीर ताब्याचा थरार; एस पी नवनीत कावत यांच्या तातडीच्या कारवाईनंतर गुन्हा दाखल

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
मातकुळी : (ता. आष्टी, जि. बीड) : मातकुळी गावात दलित शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित जमिनीवर जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने प्रकरण अधिकच गडद झाले आहे. या गंभीर प्रकारात अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तातडीने हस्तक्षेप करताच गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दिनांक 07/06/2025 रोजी संध्याकाळच्या सुमारास 7 ते 8.30 दरम्यान आरोपी दिलीप दादू जरे यांनी फिर्यादी सागर आश्रुबा लोंढे यांच्या वडिलोपार्जित जमिनीत बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत अनधिकृत ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी यांनी विरोध केल्यावर आरोपींनी जातीय अपशब्द वापरत “ही जमीन तुझी नाही; तुझा बंदोबस्त करू,” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या.
विशेष म्हणजे, गेली तीन वर्षे आरोपी या जमिनीत बेकायदेशीररीत्या शेती करत असून त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा घेत असल्याचेही फिर्यादीने स्पष्ट केले आहे. मात्र, या तक्रारीची नोंद स्थानिक पोलीस ठाण्याने दोन दिवस दुर्लक्षित केल्याचे आरोप आहेत. अखेर SP नवनीत कावत यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने कारवाई करत गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.
सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 2018 च्याअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण जनार्दन हनपुडेपाटील (DySP) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात येत आहे