भूम शहरातील विकासकामांचा बोजवारा रस्त्यावर पावसाचे पाणी, नाले तुंबले नागरिक हैराण

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा
धाराशिव: भूम शहराच्या नगरपरिषदेने विकासाच्या नावाखाली केलेल्या कामांची शोकांतिका समोर येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील रस्ते जलमय झाले असून, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून नागरिकांची प्रचंड गैरसोय व तारांबळ उडत आहे. रस्त्यावरून वाहतुकीस अडथळे निर्माण झाले असून, दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील रस्त्यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे तसेच नाल्यांचे नियोजन अपूर्ण आणि निष्क्रिय असल्यामुळे, पावसाचे साचलेले पाणी नाल्यांतून वाहून जाण्याऐवजी थेट रस्त्यावरून वाहत आहे. काही ठिकाणी तर संपूर्ण रस्त्याचे रूपांतर लहान तळ्यात झाले आहे, जे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे उत्तम उदाहरण ठरते.
भूम नगरपरिषदेने विकासकामांचा डंका पिटत अनेक ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची कामे दिली, मात्र ती कामे निकृष्ट दर्जाची आणि अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ कागदावर विकास दाखवणाऱ्या या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची देखील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. कामे देताना गुणवत्ता नियंत्रणाचे कुठलेही काटेकोर पालन झाले नाही, हे पावसाळ्यात उघड झाले आहे.
नाले स्वच्छ न करता वरवरची मलमपट्टी करण्यात आली असून, परिणामी सांडपाणी आणि पावसाचे पाणी एकत्रित होऊन आरोग्य धोक्यात आले आहे. नाल्यांचे नैसर्गिक वहन मार्गच अडवले गेले आहेत. काही ठिकाणी नाले बांधताना जागा चुकीच्या पद्धतीने निवडली गेल्याने ते भरून वाहत आहेत.
जनतेचे कर रूपी पैसे वाया घालवून, विकासाच्या नावाखाली केवळ पोकळ ढोल बडवले गेले आहेत. भूम शहरातील नागरिकांनी आता प्रशासनाकडे यासंबंधी कठोर कारवाईची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून सदर निष्काळजीपणाबाबत ठेकेदारांवर कारवाई व कामांची फेरतपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
“विकासाच्या वाद्याला प्रत्यक्ष कामांची साथ नसेल, तर ती लोकशाहीची थट्टा ठरते!”
भूम शहराला सध्या अशाच थट्टेचा सामना करावा लागत आहे. आता तरी प्रशासन जागे होईल का? हा खरा प्रश्न आहे.
संपादक : विजयसिंह गायकवाड