वडगाव शेरीच्या पाणीटंचाईवर त्वरित तोडगा काढा – अजित पवार यांचा प्रशासनाला इशारा
"वडगाव शेरीचा पाणीप्रश्न निकाली काढा; नाहीतर परिणाम भोगा – अजित पवार"

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा
पुणे: वडगाव शेरी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करा, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. पुणे विमानतळावर झालेल्या बैठकीत त्यांनी ही तंबी दिली.
वडगाव शेरी, विमाननगर, खराडी आणि चंदननगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठा अपुरा होत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेविका उषा कळमकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिलांनी अलीकडेच उपोषण केले होते. त्यावेळी माजी आमदार सुनील टिंगरे यांनी दूरध्वनीद्वारे अजित पवार यांना परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर पवार यांनी त्वरीत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर, वडगाव शेरीतील पाणीप्रश्नाचा आढावा घेण्यासाठी पुणे विमानतळ येथे बैठक आयोजित करण्यात आली. महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या चर्चेत पवार यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
या वेळी माजी आमदार सुनील टिंगरे यांनी टँकर माफियांच्या हस्तक्षेपामुळे पाणीटंचाई कृत्रिमरित्या निर्माण होत असल्याचा आरोप केला. प्रशासनाने याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप, एकनाथ गाडेकर, माऊली कळमकर, बापू कळमकर आदी उपस्थित होते.