पवईत संघर्षक्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न – सामाजिक ऐक्याचा जागर

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा :
मुंबई : पवई प्रतिनिधी( प्रतीक कांबळे ) पवईतील महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करण्याची परंपरा कायम राखत, संघर्ष क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ आणि फातिमा शेख यांची संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. हा भव्य सोहळा १५ फेब्रुवारी रोजी हरिश्चंद्र मैदान, पवई येथे संपन्न झाला.
या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, कवी संमेलन आणि आंबेडकरी प्रबोधनात्मक गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी आणि महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी स्थानिक कलाकार, साहित्यिक आणि महिलांनी विशेष योगदान दिले.
महिला सक्षमीकरणाचा सशक्त संदेश
कार्यक्रमाचे आयोजन अँड. प्रिती हेलोडे यांनी केले असून, त्यांना मार्गदर्शन विद्यानंद काकडे यांचे लाभले. विशेष म्हणजे, पवईतील महिलांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम यशस्वी केला.
यामध्ये कल्पना घोक्षे, किर्ती हांडोरे, राजश्री भवरे, सुरेखा हराळे, अनिता धनवे, रेखा वाकोडे, चारिका काकडे, सविता सरोदे, रमा वाघोदे, दिपाली पंडागळे, सोनाली जगताप, सपना पगारे, ॲड. रत्नाकर डावरे, अँड. जगन्नाथ आढाव, ज्ञानोबा शिंदे, नवीना गवई, अनिता जाधव, सविता वाटेकरी, रंजना गाडे, सुजाता निकाळजे, आशा इंगोले आदींसह अनेक महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
महापुरुषांचा वारसा – युवा पिढीसाठी प्रेरणा
या कार्यक्रमात लहान मुलांना त्यांच्या कला-सामर्थ्याला वाव मिळावा यासाठी विशेष सत्र ठेवण्यात आले. स्थानिक महिलांनी माता रमाई, माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची वेशभूषा करून अभिवादन केले.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरित केले. तसेच, स्थानिक कवींनी आपल्या साहित्यातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला, तर भीमबुद्ध गीतांनी वातावरण भारावून टाकले.
संघटनेच्या आयोजकांनी असे सांगितले की, “महापुरुषांचे विचार जनमानसात पोहोचवणे आमचे कर्तव्य आहे आणि हे कार्य आम्ही सातत्याने करत राहू. संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न आम्ही सत्यात उतरवू.”
सामाजिक ऐक्य व प्रबोधनाचा उत्सव
या संयुक्त जयंती महोत्सवाने सामाजिक एकता, स्त्रीशक्तीचा गौरव आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रचार यांचा आदर्श घालून दिला. स्थानिक नागरिक, कवी, कलाकार, विचारवंत आणि महिलांनी दिलेल्या योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.
संपादक: विजयसिंह गायकवाड