Uncategorized

प्रत्येक नागरिक गुन्हेगार नाही’ वाहतूक पोलिसांना नम्रतेने वागण्याचे निर्देश

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा:

पुणे शहर (प्रतिनिधी) : “रस्त्यावर चालणारा प्रत्येक नागरिक गुन्हेगार नसतो. वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर योग्य ती कारवाई करावी, मात्र ती करताना वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांशी सौजन्याने वागण्याची गरज आहे,” असे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिले.

मुंबईच्या धर्तीवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेसाठी विशेष प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे आणि सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होते. वाहतूक व्यवस्थेच्या सुधारण्यासाठी महापालिका आणि विविध शासकीय यंत्रणांसोबत समन्वय साधला जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पुणे पोलिसांना पायाभूत सुविधा आणि वाहतूक सुधारणा यासाठी एकूण एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नवीन भरती प्रक्रियेतून ८०० नवीन पोलीस दलात दाखल झाले असून, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी ४३५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, नवीन सात पोलीस ठाण्यांचे उद्घाटन करण्यात आले आहे.

वाहतूक शाखा ही पुणे पोलिसांसाठी जनसंपर्काचा महत्त्वाचा दुवा आहे. वाहनचालक किंवा पादचारी हा संशयित नाही, तर नागरिक आहे, याची जाणीव पोलिसांनी ठेवावी. कायद्याची अंमलबजावणी करताना नम्रता आणि शिस्त यांचे संतुलन राखावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

संपादक: विजयसिंह गायकवाड

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button