सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही”; शरद पवारांचा निर्धार

दिपसागर न्यूज ऑनलाइन सेवा पोर्टल :
मुंबई:विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असून राजकीय नेत्यांकडून सभांत आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीकडून खासदार राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. अशातच आता धाराशिवमधील प्रचारसभेत बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी “सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही”, अशा शब्दात महायुतीला इशारा दिला आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “काही लोकांनी आमची साथ सोडली. भाजपाच्या पंक्तीत गेले. अगोदर सांगत होते विकासासाठी गेलो, पण आता भुजबळ नावाचे मंत्री सांगत आहेत की, ईडीच्या भीतीने, मला तुरुंगात टाकले होते म्हणून आम्ही भाजपासोबत गेलो, एक प्रकारे लाचारीचे दर्शन घडले आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. ओमराजे निंबाळकर मला तुमची गोष्ट अजिबात पटली नाही. तुम्ही मला या वयातही फिरतो म्हणालात. मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही. शांत बसणार नाही”, असा निर्धार यावेळी खासदार शरद पवार यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, लोकसभेला भाजपने संविधान बदलण्यासाठी ४०० पारची घोषणा केली. मात्र तुम्ही लोकांनी निर्णय हाती घेतला. तुम्ही-आम्ही एकत्र झालो आणि महाराष्ट्रातील ४८ खासदारांपैकी ३१ खासदार निवडून आणले. तुम्ही राज्यघटना वाचवायचे काम केले. ही विधानसभा तुमच्या विचाराच्या लोकांच्या हातात पाहिजे. सत्ता हातात आल्यावर नागरिकांचे प्रश्न सोडवता येतात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही शरद पवारांनी केले.